‘ईडी’ने सर्व मर्यादा ओलांडल्या   

सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय सर्व मर्यादा ओलांडतानाच संघराज्य रचनेचे उल्लंघन करत आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी ईडीला फटकारले.यासोबतच, तामिळनाडू राज्य विपणन महामंडळाविरुद्धच्या  (टीएसएमसी) ईडी चौकशीला न्यायालयाने स्थगिती दिली. तामिळनाडू सरकार आणि तामिळनाडू राज्य विपणन महामंडळ (टीएसएमसी) यांनी दाखल केलेल्या अर्जावरुन ईडीला नोटीस बजावतानाच १५ दिवसांत उत्तर सादर करण्यास सांगितले.
 
सरन्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठासमोर याबाबतचा अर्ज सुनावणीस आहे. ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी तर द्रमुक सरकारतर्फे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अमित आनंद तिवारी बाजू मांडत आहेत. तामिळनाडूत १ हजार कोटींचा मद्य गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप ईडीने केला आहे. 
 
दरम्यान, तामिळनाडू सरकारने २०१४ ते २०२१ या कालावधीत टीएसएमसीच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांविरुद्ध ४१ गुन्हे दाखल केले आहेत. राज्य सरकार मद्य विक्री परवाने देण्यातील अनियमिततेसह इतर आरोपांची चौकशी करत आहेत. अशा परिस्थितीत ईडीने या प्रकरणात गुन्हा दाखल केला, असे सांगितले.
 
यावर सरन्यायाधीशांनी आश्चर्य व्यक्त केले. तुम्ही एखाद्या व्यक्तीविरोधात खटला दाखल करत होतात. पण, आता थेट महामंडळावरच कारवाई? असा सवाल करतानाच ईडीने आता खरोखरच सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहे, असे निरीक्षण नोंदविले. जेव्हा राज्य सरकार चौकशी करत आहे, तेव्हा अशा हस्तक्षेपाची काय गरज होती?’ असा सवालही सरन्यायाधीशांनी केला.
 
तामिळनाडूत द्रमुकचे सरकार आहे. द्रमुक सरकार आणि मद्य विक्रीचा संपूर्ण कार्यभार सांभाळणार्‍या तामिळनाडू राज्य विपणन महामंडळाने ईडीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
 

Related Articles